वेंगुर्ले : कमी किमतीत स्वयंचलित सिंचन यंत्र विकसित करणाऱ्या अद्वैत प्रकाश बोवलेकर याला ‘यंग इनोव्हेटर अॅवॉर्ड’ने गौरवण्यात आले आहे. झी २४ तास या वृत्तवाहिनीकडून हा पुरस्कार दिला जातो. मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यातील असलेला अद्वैत सध्या दापोली येथे कृषी अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे.
अद्वैत वेंगुर्ल्यातील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचा माजी विद्यार्थी असून, अॅड. प्रकाश बोवलेकर व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कर्मचारी प्रतीक्षा बोवलेकर या दाम्पत्याचा मुलगा आहे. सध्या तो रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात अद्वैत एम. टेक. करत आहे. देशात उपलब्ध असलेल्या स्वयंचलित सिंचन यंत्रणांची किंमत १५ ते २० लाख रुपयांच्या दरम्यान आहे. तसेच त्या यंत्रणांतून पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही; मात्र अद्वैतने तयार केलेली यंत्रणा अवघ्या पंधरा हजार रुपयांत तयार होऊ शकत असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारी आहे.
जमिनीमधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यावर मोटार व व्हॉल्व्ह आपणहून सुरू होण्याची व्यवस्था या यंत्रणेत आहे. तसेच पुरेसे पाणी पिकाला दिल्यावर व्हॉल्व्ह व मोटार आपणहून बंद होते. त्यामुळे पिकाची वाढ चांगली होते आणि उत्पन्नही वाढते. या यंत्राला चार व्हॉल्व्ह जोडता येतात. जमिनीमधील पाण्याचे प्रमाण सतत एलसीडी स्क्रीनवर दिसते. विशेष म्हणजे यामध्ये कोठेही मानवी हस्तक्षेप लागत नाही. संपूर्ण यंत्रणा स्वयंचलित आहे. या संशोधनाचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे. हे संशोधन करताना अद्वैत बोवलेकरला महाविद्यालयाचे शिक्षक सुनील पाटील, नितीन पालटे, डॉ. उत्तम कदम, डॉ. महानंद माने, डॉ. सचिन नंदगुडे यांचे मार्गदर्शन लाभले.
राज्यपालांच्या हस्ते गौरव ‘यंग इनोव्हेटर अॅवॉर्ड’साठी झी २४ तास या वृत्तवाहिनीने यंदापासूनच स्पर्धा घ्यायला सुरुवात केली. अभियांत्रीकी, शेती, गणित, तंत्रज्ञान या क्षेत्रातील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील सुमारे सहा हजार पाचशे महाविद्यालयांमधील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. याच स्पर्धेत अद्वैतने यश मिळवले. मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर यांच्या हस्ते रोख दहा हजार रुपये, मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देऊन अद्वैतचा गौरव करण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख आदी मान्यवरही उपस्थित होते. या संशोधनाबद्दल आणि यशाबद्दल अद्वैतचे सर्व क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.